पुणे – दि:१४/०९/२०२१
मुंबई येथे कुर्ला येथील खैरानी रोड परिसरात एकट्या महिलेवर जी अत्याचाराची घटना घडली, त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सदर घटनेत आरोपीवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एक महिन्यात सविस्तर चौकशी होऊन कोर्टात एक महिन्यात चार्जशीट दाखल करणे व फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर निर्णय होईल असे पोलिसांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई पोलिसांनी महिलां वरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबात ११ सूचनांचा समावेश असलेले परिपत्रक दि .१३/०९/२०२१ रोजी प्रसिद्ध केले आहे,असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, *मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्येक रेल्वे स्थानक,बस स्थानक,निर्जन जागा या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणे यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. शक्ती कायदा येत्या अधिवेशनात मंजूर केला जाईल तसेच बेघर महिलांच्या राहण्यासाठी सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्याबाबत योजना निश्चित करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केल्याचे त्यांनी सांगून हे आवश्यक होते असे नमुद केले .*
सदर परिपत्रकात पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत मुंबई पोलीस आयुक्त श्री हेमंत नगराळे यांनी निर्देश दिले आहेत.
*१) नियंत्रण कक्षाने सक्षम पणे काम करण्याबाबत व रिस्पॉन्स वेळ कमी करण्याबाबत सक्षमपणे काम करावे.*
*२)अंधाऱ्या व निर्जन ठिकाणी लाईट व सीसीटीव्ही बसवणे बाबत तात्काळ कार्यवाही करावी व या भागामध्ये व ठिकाणांवर पोलीस अधिकारी यांची गस्त वाढवावी.*
*३)सार्वजनिक महिला प्रसाधनगृहात लाईटची व्यवस्था करावी.*
*४)रात्री गस्तीदरम्यान एकटी महिला आढळून आली तर तिला सुरक्षित स्थळी पोहचणे साठी मदत करावी.*
*५)अंमली पदार्थाची नशा व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करावी.*
*६)रस्त्यावरील बेवारस टेम्पो, टॅक्सी , ट्रक यांचा शोध घेऊन या बेवारस वाहनांना तेथून काढण्याबाबत कारवाई करावी.*
*७) महिला संबंधित कलम ३५४, ३६३,३७६,५०९ भादवि व पॉक्सो कायद्यांतर्गत अटक झालेल्या आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा व अशा सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.*
सदर परिपत्रकातील सुचानां सोबतच महाराष्ट्र पोलीस व केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या मध्ये समन्वयातून निर्जन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त असणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. कोणत्याही महिलेने लहानशी जरी तक्रार दाखल केली तरी तिचा गांभीर्याने विचार होऊन व आवश्यक चौकशी करून संबंधीतावर आवश्यक कारवाई करावी असे त्यांनी स्पष्ट केले.