*सामाजिक कार्यासाठी संघर्षरत व्यक्तींच्या पाठीशी समाजाने उभे रहावे* *-विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे*

Share This News

कोल्हापूर, दि.31(जिमाका): समाजात चांगले बदल घडवण्यासाठी व सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी समाजातील प्रत्येकाने ठामपणे उभे रहावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले.

दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम तसेच ‘अंगारझळा’ व ‘दिलासा’ पुस्तकांचे प्रकाशन आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, दिलासा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. डॉ. रुपा शहा, प्रा.डॉ. विभा शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते राजहंस प्रिंटिंग प्रेसचे ऍड विद्याधर पाटील, सुनील नागावकर, ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ, अमित आसलकर, प्रा.डॉ.विभा शहा, स्मिता शरद गोसावी, श्री. सिद्धनेर्ली व श्रीमती निर्मळे यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, समाजातील अनेक घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजवर ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळेच समाजात चांगले बदल घडवण्यासाठी, सामाजिक बदलासाठी संघर्ष करण्याची ताकद मिळाली, असे सांगून त्या म्हणाल्या, एखाद्या ठिकाणी महिलेवर अत्याचार, हिंसाचार होत असल्याचे दिसल्यास पोलीस विभागाला कळवल्यास ही घटना टाळता येऊ शकते.
सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम आपल्या प्रत्येकाचं असून समाजात तयार झालेले सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी समाजानेच पुढाकार घ्यायला हवा. बालविवाह रोखणारी महिला म्हणून रूपा शहा यांना समाजात टीकेला सामोरं जावं लागलं, पण त्या न डगमगता आजवर कार्यरत राहिल्या. स्त्रियांच्या चळवळीसाठी प्रामाणिकपणे आणि धाडसाने काम करण्याचं काम रूपा शहा यांनी केलं असून त्यांचा उल्लेख ‘वन मॅन आर्मी’ असा केल्यास वावगे ठरणार नाही. अंधाऱ्या रात्रीत चांदण्यांचा प्रकाशही वाटसरूला वाट दाखवण्याचे काम करतो, त्याप्रमाणे गरजूंसाठी मदत करणाऱ्या दिलासा संस्थेचे काम महत्वपूर्ण आहे.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, स्त्री शक्ती ही अलौकिक असून या शक्तीचे एक रुप म्हणजे उपसभापती निलम गोऱ्हे आहेत. संघर्षमय जीवन जगत यशस्वी झालेल्या महिलांच्या जीवनावरील पुस्तके माझ्या मुलीला वाचायला देणार असून माझ्या आईच्या संघर्षमय जीवनाबरोबरच रूपा शहा यांच्या ‘अंगारझळा’ आणि ‘दिलासा’ या पुस्तकांचाही समावेश करेन असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, घोशा घराण्यात महिलांनी घराबाहेर पडायचे नाही, असा दंडक असल्याच्या काळात मी केवळ तीन वर्षांचा असताना वडिलांचे छत्र हरपले. कठीण परिस्थितीत माझ्या आईने खूप संघर्ष करून राजकीय क्षेत्रात यश मिळवले आहे, असे सांगून ‘आई’च्या त्यागाची महती विशद केली.

प्रा.डॉ. रुपा शहा यांनी दिलासा संस्थेच्या वाटचालीत उपसभापती निलम गोऱ्हे यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून संस्थेचा खडतर प्रवास उलगडला. माणसाने माणसाशी सहकार्याने वागायला हवे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मालतीबाई निर्मळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा.डॉ.उषा पाटील यांनी मानले.